आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधाराचे नाव 

0

सोलापूर,दि.4: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार उत्तम जानकर हे सातत्याने भाजपावर ईव्हीएम मशीनचा गैरवापर करत निवडणूक जिंकल्याचा आरोप करत आहेत. यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र निवडणूक आयोग बॅलेट पेपवर मतदान घेणार असेल तर आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. ईव्हीएम घोटाळ्याचे पुरावे समोर आणणार असल्याचे जानकर यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप जानकर यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन सेटिंग करण्याची जबाबदारी मोहित कंबोजवर दिली होती. ईव्हीएम घोटाळ्याचा सूत्रधार कंबोजच आहेत, असा गंभीर आरोप माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडी गावात ‘ईव्हीएम’चा पर्दाफाश करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारीही केली होती. मात्र, प्रशासन आणि पोलिसांनी दडपशाही करून बॅलेट पेपरवरील मतदानाची प्रक्रिया होऊ दिली नाही. आज आमदार जानकर यांनी एक व्हिडीओ जारी करत आणखी गंभीर आरोप केले. ईव्हीएम घोटाळ्याच्या तळाशी आपण जाणार, सबळ पुरावे शोधणार आणि पूर्ण पर्दाफाश करणार असे जानकर म्हणाले.

काय म्हणाले आमदार उत्तम जानकर?

कोण मोहित कंबोज? हा माणूस राजकीय नाही. कधी आमदार, मंत्री नाही. तरीही निकालाच्या दिवशी 120 जागा निवडून येणार, असं तो ओरडून सांगत होता. यातून काय संदेश देताय महाराष्ट्राला? असा सवाल जानकर यांनी केला. ईव्हीएम मशीनमध्ये सेटिंग करण्याची जबाबदारी कंबोज यांच्यावर सोपविली होती. ती त्यांनी चोख पार पाडली. हा फक्त एक टक्का पुरावा आहे. 99 टक्के पुरावे बाकी आहेत, असे जानकर यांनी सांगितले.

सरकार जाईल

घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी 3 ते 4 महिने लागतील. तेव्हा महाराष्ट्र माझ्यासोबत उभा राहील आणि हे सरकार शंभर टक्के जाईल. हे सरकार आभाळातून पडले आहे, असा टोलाही जानकर यांनी हाणला.

ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही मात्र…

ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही हे मान्य आहे; पण त्याच्याशी छेडछाड किंवा मतांमध्ये फेरफार होऊ शकते हे मानण्यास वाव आहे, ईव्हीएम ‘हॅक’ करता येऊ शकत नाही, पण ‘मॅनिप्युलेट’ करता येऊ शकते. असे स्पष्ट मत कम्प्युटर सायन्स आणि सॉफ्टवेअर तज्ञांनी आज व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित ‘ईव्हीएम लोकशाहीचे संरक्षक की धोका?’ या दी बिग डिबेट चर्चासत्रात कम्प्युटर सायन्स क्षेत्रातील तज्ञ माधव देशपांडे आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर तीर्थराज सामंत यांनी ईव्हीएमबाबत स्पष्ट मते व्यक्त केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here