संतोष देशमुख हत्त्या प्रकरण, मनोज जरांगे पाटील यांची मोठी मागणी 

0

परभणी,दि.4: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत निषेध मूक मोर्चा काढण्यात आला. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे करण्यात येत असलेल्या संयुक्त तपासाद्वारे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र अजूनही एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरोपींच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना मोठी मागणी केली आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच आरोपींना मदत करणाऱ्यांनाही अटक करावी असंही म्हटलं आहे. आरोपींचा आकडा 50 ते 60 वर जाऊ शकतो असाही दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. हत्या खंडणीमुळे झाली. खंडणी मागणारा मुख्य असून, खून करायला सांगण्यात आलं. फोन रेकॉर्डही आता पोलिसाकडे आले असतील. खंडणी मागणारे आणि हत्या करणारे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे असं मनोज जरांगेंचं म्हणणं आहे. 

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीत निषेध मूक मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मनोज जरांगे यांच्यासह देशमुखांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. या मोर्चाआधी मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यांच्या बापाचा बाप आला तरी… 

मनोज जरांगे म्हणाले, “यांच्या बापाचा बाप आला तरी प्रकरण थंड होऊ देणार नाही, दबू देणार नाही. तुम्ही लपताय ना मग आता बघा. सीआयडी, पोलीस प्रशासन, एसआयटी जे चौकशी करत आहेत यांनी नुसतं ऐकून घेऊ नका. पुढे असे खून कऱणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत, त्यासाठी ज्यांना मदत केली त्यांना कडक शिक्षा करा. लपवून ठेवलं म्हणजे तेदेखील षडयंत्रात सहभागी होते. यांनी ज्यांच्या गाड्या वापरल्या तेदेखील जबाबदार आहेत, एखाद्याचं लेकरु गेलं याचं दु:खच नाही. यांना धडा शिकवणं गरजेचं आहे”. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here