नवी दिल्ली,दि.२२: केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांचा हल्ला अधिक तीव्र होत असून, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत थेट सरकारला लक्ष्य केले. शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ, पेपर लीक प्रकरणे आणि विद्यार्थ्यांवरील अन्याय या मुद्द्यांवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राहुल गांधी यांनी सर्वप्रथम केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवण्याची मागणी केली. परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाची जबाबदारी निश्चित व्हावी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आंदोलन करणाऱ्या तरुणांवर बलप्रयोग करणे चुकीचे असून, सरकारने याबद्दल सार्वजनिक माफी मागावी, अशी त्यांची भूमिका होती.
तिसरी महत्त्वाची मागणी म्हणजे देशातील परीक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची. सतत घडणाऱ्या पेपर लीक घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली उभी करण्यासाठी केंद्राने ठोस पावले उचलावीत, असे त्यांनी सांगितले.
देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत राहुल गांधी यांनी सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. शिक्षण व्यवस्था आणि तरुणांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांवर तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.








