मुंबई,दि.27: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे, तसेच बॅलेट पेपवर निवडणुका घ्याव्यात यासाठी राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम संदर्भात याचिका फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. ‘ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभूत होतात, तेव्हा ईव्हीएमध्ये छेडछाड’, अशा शब्दात कोर्टाने झापले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. निवडणूक निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले म्हणाले की, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाणार आहे. जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत.
विधान राजकीय…
पटोले म्हणाले की, ईव्हीएम संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना केलेले विधान राजकीय आहे, असे मत मांडता येते का हा प्रश्न आहे. निकाल देताना कायद्यात काय तरतूद आहे. त्यावर स्पष्टता असायला हवी होती. परंतु न्यायाधीश व न्यायालयाच्या निकालावर जास्त काही बोलणे उचित नाही असेही पटोले म्हणाले.
जनभावना तीव्र झाल्यानंतर 150 वर्षांची ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली हा इतिहास आहे. लोकशाही व्यवस्थेत जनताच सर्वोच्च असून जनभावनेचा आवाज काँग्रेस उठवत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.