सोलापूर,दि.15: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासन निधी गैरवापर प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, सोलापूरकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी याबाबत तक्रार दिली होती. नागणसुरे यांनी भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासन निधीमध्ये गैरवापर करण्यात आला अशी तक्रार नागणसुरे यांनी सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. यात महापालिका आयुक्त, उपायुक्त, नगर अभियंता, आमदार विजयकुमार देशमुख व मक्तेदार नगरसेवक यांच्या विरोधात पुरावे सादर करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरीष्ठ निरीक्षक पिंगुवाले यांनी पुरावे सादर करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे, असे सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसुरे यांनी माहिती दिली.
काय आहे प्रकरण?
सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीचा गैरवापर केल्याचा आरोप नागणसुरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीचा गैरवापर करून बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून सवर्ण वस्तीमध्ये निधी खर्च करून मागासवर्गीय बंधू भगिनीं रहात असलेल्या भागावर अन्याय केल्याचा आरोप नागणसुरे यांनी केला होता.
शहर उत्तरचे स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतःच्या आमदारकीचा गैरवापर करून स्थानिक सोलापूर महानगरपालिका प्रशासनावर दबाव टाकून किंवा त्यांच्याशी संगणमत करून सदर योजनेअंतर्गत संपूर्ण सवर्ण वस्तीमध्ये योजनेच्या तरतुदीस हरताळ फासून कामे सुचवलेले आहेत. सदरची कामे व निधी हा पूर्णपणे दलित वस्त्या गलिच्छ वस्त्या यांच्या विकासासाठी आहे. असे नागणसुरे यांनी सांगितले.
अस्वीकरण: बातमीतील दाव्याच्या सत्येतेची हमी सोलापूर वार्ता घेत नाही.
Disclaimer: Solapur Varta Does Not Guarantee The Truth Of The Claim Made By Jairaj Naganasure.