मुंबई,दि.३०: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ करणारी बातमी समोर आली आहे. २००९ मधील कल्याण मतदारसंघातील एका प्रचारादरम्यान झालेल्या वादाप्रकरणी कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले असून, ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे स्वतः न्यायालयात जाणार की आपल्या वकिलांमार्फत बाजू मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
हे प्रकरण २००९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानचे आहे, जेव्हा कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे आणि शिवसेनेचे आनंद परांजपे यांच्यात थेट लढत होती.
प्रचार सभेतील व्हिडिओ: डोंबिवलीत झालेल्या एका जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओत डावखरे आपल्या कार्यकर्त्यांना ‘पोलीस किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना न घाबरता निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करा’ असे सांगत असल्याचा दावा करण्यात आला होता.
मॉर्फ्ड व्हिडिओचा आरोप: वसंत डावखरे यांनी हा व्हिडिओ खोटा आणि एडिट (मॉर्फ) केलेला असल्याचे सांगत तो फेटाळून लावला होता. केवळ आपली बदनामी करण्यासाठीच शिवसेनेने हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला.
न्यायालयात धाव: शिवसेनेने हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर संतप्त झालेल्या डावखरे यांनी थेट न्यायालयात धाव घेत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.
तक्रारदाराच्या निधनानंतर आता पुढे काय?
या खटल्यातील मुख्य तक्रारदार वसंत डावखरे यांचे निधन झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला काय वळण मिळणार, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
डावखरे यांच्या निधनानंतर त्यांचे कुटुंब या खटल्याबाबत काय भूमिका घेते, यावरही या प्रकरणाचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडून न्यायालयात काय युक्तिवाद केला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








