जालना,दि.१४: महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या राजकीय आणि कायदेशीर संघर्षावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ या चिन्हासाठी लढाई सुरू असताना, फडणवीसांनी थेट ‘लोकन्यायालया’चा दाखला देत महायुतीची भूमिका स्पष्ट केली.
जालन्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी केवळ शिवसेनेचाच नव्हे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही आवर्जून उल्लेख केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधी फडणवीसांचा मोठा दावा
सुनावणीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले: “याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय नक्कीच अंतिम निर्णय देईल. पण जनतेच्या म्हणजेच ‘लोकन्यायालयाने’ २०२४ च्या निवडणुकीत आधीच यावर शिक्कामोर्तब केले आहे.”
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेला भरघोस पाठिंबा हाच खरा जनादेश असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले.
“सुप्रीम कोर्टाकडूनही तीच अपेक्षा”
फडणवीस पुढे म्हणाले की, जनतेने एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचीच राष्ट्रवादी खरी असल्याचा निर्णय निवडणुकीतून दिलेला आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष सर्वोच्च काय निर्णय देते याकडे लागले असले, तरी सर्वोच्च न्यायालयसुद्धा जनतेचा हाच कौल आणि जनादेश विचारात घेऊन निर्णय देईल, अशी आम्हाला ठाम अपेक्षा आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
कायदेशीर लढाई: शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
जनादेशाचा संदर्भ: २०२४ च्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी असल्याचे जनतेने सिद्ध केल्याचा दावा.
अपेक्षा: सर्वोच्च न्यायालयाचा निकालही लोकन्यायालयाला धरूनच येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.







