नागपूर,दि.१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी गावाचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षाने EVMचा (ईव्हीएम) गैरवापर भाजपने केल्याचे म्हटले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडी गावातील लोकांनी 3 डिसेंबरला बॅलेट पेपवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मारकवाडी गावातील लोकांचे म्हणणे होते की त्यांच्या गावातून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना जास्त मते मिळणे शक्य नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार उत्तम जानकर हे विजयी झाले आहेत. मात्र या मतदारसंघातील मारकवाडी गावाने ईव्हीएमवर संशय व्यक्त करत पुन्हा एकदा मतदान करून घेण्याचा निर्णय घेतला होता. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते.
तसेच ईव्हीएम मशीनमुळे भाजपाची सत्ता आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात पराभूत उमेदवारांना पडलेली समान मतांवरूनही संशय व्यक्त केला जात होता. समसमान मते पडणे हे पहिल्यांदाच घडलंय का, २०१२ पासून अनेकांना सारखी मते पडली आहेत. २०१४ च्या निवडणुकीतही अनेक उमेदवारांना समान मते पडली आहेत. आपल्या मनाचं समाधान करून घेण्यासाठी असे आरोप केले जातात असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
या देशात २०१२ पर्यंत EVM होते, त्यानंतर EVM नव्हे तर VVPAT आलंय. आपण प्रत्येकजण मतदानाला जातो, त्यानंतर कोणाला मत दिले हे चिन्ह VVPAT मध्ये दिसते. ते बॅलेट बॉक्समध्ये जाते. ईव्हीएम मतमोजणीसोबतच VVPAT मतमोजणी केली जाते. ही दोन्ही मतदान जुळले तरच निकाल जाहीर केला जातो. आता ईव्हीएम नाही तर बॅलेट पेपरवरील VVPAT आहेत. त्यामुळे EVM, EVM हे Every Vote for Maharashtra हे मतदान महाराष्ट्राने आम्हाला दिले आहे.
मारकवाडी गावातून राम सातपुते यांना जास्त मते मिळाल्यानंतर तुम्ही लोकांना धमकवता त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत. आपल्याला बॅलेट मतदान घ्यायचे आहे. त्यात मत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाले पाहिजे. बॅलेट व्होटिंगमध्ये लोकांना धमकावून राष्ट्रवादी शरद पवार गटाला मतदान करण्याची धमकी दिली जात होती. लोकशाहीत अशी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ही कुठली लोकशाही..? असा परखड सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला. फेक नरेटिव्ह फॅक्टरीत मारकडवाडी आणली. मला शरद पवारांचे आश्चर्य वाटते. काँग्रेसने याआधी EVM चा मुद्दा मानला. शरद पवारांनी पहिल्यांदाच EVM वर भाष्य केले.
२०१९ ते २०२४ व्यक्तिगत मला आणि माझ्या कुटुंबाला टार्गेट करण्यात आले हा कदाचित रेकॉर्ड असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत काही लोक एकाच व्यक्तीवर बोलत होते. त्या लोकांनी जे वातावरण खराब केले. मला टार्गेट केले त्यातून राज्यातील जनतेत माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. ५ वर्ष जाती धर्माचा विचार न करता मुख्यमंत्री म्हणून मी काम केले होते हे जनतेने पाहिले होते.