नवी दिल्ली,दि.५: पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) सध्या राजकीय घडामोडी आणि हिंसक आंदोलनांमुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी ‘नॅशनल कॉन्फरन्स’ (NC) पक्षाचे ज्येष्ठ खासदार चौधरी मोहम्मद रमजान यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग नसून तो एक स्वतंत्र देश आहे, असे बेताल विधान त्यांनी केले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना रमजान म्हणाले, “आम्हाला पाकव्याप्त काश्मीरची अजिबात चिंता नाही. तो एक वेगळा देश असून दुसऱ्या राष्ट्राचा भाग आहे. तिथे काय करायचे, याचा निर्णय पाकिस्तान सरकारच घेईल.” पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, PoK मधील स्थानिक जनतेने त्यांना निवडून दिले नसल्याने, तेथील नागरिकांच्या प्रश्नांवर किंवा हिंसेवर संसदेत भाष्य करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही.
आंदोलन आणि लष्करी कारवाईच्या काळात वादग्रस्त विधान
गेल्या काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये महागाई आणि निवडणुकीतील गैरव्यवहारांविरोधात जनतेचा तीव्र रोष पाहायला मिळत आहे. या आंदोलनाला हिंसक वळण आले असून, पाक लष्कराने केलेल्या गोळीबारात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा संवेदनशील काळात, विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ (INDIA) आघाडीत समाविष्ट असलेल्या आणि फारुक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्सच्या खासदाराने हे वक्तव्य केल्याने राजकीय स्तरावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.








