उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा 

0

नागपूर,दि.11: महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे सरकार आहे. महायुती सरकारच्या उद्योग, पर्यटन, कृषी, समाजकल्याण क्षेत्रातील अनेकविध योजनांमुळे संपूर्ण विदर्भासह उमरेड परिसराचे  चित्र आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविण्यासाठी  भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी  केले. 

उमरेड (जि. नागपूर) मतदारसंघातील भाजपा-महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, माजी आमदार राजू पारवे, आनंदराव राऊत, दिलीप सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. महायुतीला पुन्हा सत्ता दिल्यास विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 25 हजार रु. एवढा बोनस देऊ, अशी घोषणाही फडणवीस यांनी या सभेत केली.

2009 साली सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र तत्कालीन सरकारने त्यांना केवळ एक लाख रुपये मोबदला दिला. आपले सरकार आल्यानंतर आपण सारे नियम बाजूला ठेवत त्यांना दोन लाख रुपये मिळवून दिले. विदर्भ प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन पॅकेज दिले. आता पुन्हा सत्तेवर येताच गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन समाधानकारक पद्धतीने करणार, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

15 लाख रूपये बिनव्याजी कर्ज

तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपले सरकार आल्यावर 15 लाख रूपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी कृषि पंप वीज बिल माफी, मागेल त्याला सौर पंप योजना, कृषी वीज वितरण कंपनीची स्थापना अशा अनेक योजना महायुती सरकारने आणल्या. एक रुपयात पीक विमा योजना आणून 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. नमो किसान योजने अंतर्गत 12 हजार रूपये दिले. महायुती सरकार सत्तेवर येताच त्यात वाढ करत 15 हजार रुपये दिले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here