सोलापूर,दि.२३: देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी नागपूरची दंगल घडवून आणली का? अशी शंका दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून व्यक्त केली आहे. औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात वाद निर्माण झाला आणि हिंसाचार भडकला. औरंगजेबाची कबर हटवावी यासाठी सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आंदोलन व निदर्शने करण्यात आली. मात्र नागपुरात यावरून हिंसाचार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूर हिंसाचार घडवून आणला का? अशी शंका राऊत यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक सामना रोखठोक सदर जसेच्या तसे
औरंगजेब चारशे वर्षांपासून थडग्यात विसावला आहे. त्या थडग्यावरून महाराष्ट्रात दंगल पेटवण्यात आली. नागपूरची निवड त्या दंगलीसाठी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी नागपूरची निवड कोणी केली काय? नवहिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाला भाजपमधील बाटगे खतपाणी घालत आहेत. हा धोका महाराष्ट्राला आहे!
फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी…
चारशे वर्षांपूर्वी कबरीत गेलेल्या आलमगीर औरंगजेबावरून महाराष्ट्रात दंगल उसळली. दंगलीचा केंद्रबिंदू नागपूर आहे हे विशेष. राज्यकर्तेच दंगली घडवतात हे खरे, पण त्या राज्यकर्त्याला आपल्या मतदारसंघात, आसपास दंगल नको असते. त्यामुळे नागपूरच्या दंगलीत मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका आहे हे मानायला मी तयार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात हे सर्व घडले. त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी नागपूरची युद्धभूमी केली काय? हा प्रश्न आहे.
नागपूरच्या दंगलीने गृहखात्याचा डोलारा पोकळ पायावर उभा आहे हे दिसले व बीड, परभणीपासून नागपूरपर्यंत याचे प्रत्यंतर रोजच येत आहे. गुजरातच्या दाहोदमध्ये 3 नोव्हेंबर 1618 ला औरंगजेबाचा जन्म झाला. तो दिल्लीत गेला व दिल्लीतून महाराष्ट्र काबीज करायला निघाला आणि महाराष्ट्रातच कबरीत गेला. औरंगजेबाच्या अनेक बेगमा होत्या, पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. तीसुद्धा गुजरातचीच होती.
आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांचीच सत्ता आहे व त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर उखडायची आहे. याच समर्थकांनी गांधी हत्यारा गोडसेचा गौरव केला व त्यांना हिटलरही प्रिय आहे. महाराष्ट्रात हे असे विष पसरवून नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे आहे.
हिंदू-मुसलमानांचा झगडा लावण्याची बाबराची क्षमता आता संपली. पाकिस्तानमुळेही दंगे पेटत नाहीत. त्यामुळे कबरीतला औरंगजेब बाहेर काढण्याची योजना आली. महाराष्ट्रातील एक आमदार अबू आझमी म्हणाले, “औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याची लढाई ही धर्माची नव्हती तर सत्तेची होती. त्याने अनेक हिंदू मंदिरे बनवली.” आझमी यांच्या वक्तव्यावरून गोंधळ झाला. मुसलमानांना आजही बाबर, औरंगजेब वगैरे त्यांचे शासक वाटतात व त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या जातात. हे सध्याच्या नवहिंदुत्ववाद्यांच्या पथ्यावर पडते व ते चेकाळतात. इस्लामी दरबारी मोहम्मद साकी मुस्तैद खानने मासीर-ए-आलमगिरी (1731) मध्ये लिहिले की, औरंगजेबाने फर्मान जारी करून काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून तेथे मशिदीचे निर्माण केले. इतर धर्मीयांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा आदेश दिला. मथुरेतील केशवराय मंदिर उद्ध्वस्त केले आणि जोधपुरातील अनेक मंदिरे तोडून त्यांचे अवशेष जामा मशिदीच्या जिन्यांखाली दफन केले. शिखांचे नववे गुरू तेगबहादूरजी आणि इतर शीख धर्मीयांची हत्या त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला म्हणून केली. छत्रपती संभाजीराजांची हत्या त्याने निर्घृण पद्धतीने केली.
औरंगजेब हा सत्तापिपासू आणि धर्मांध होताच…
औरंगजेब हा सत्तापिपासू आणि धर्मांध होताच होता. त्याने आपला बाप शहाजहानला कैद केले. तीन भाऊ दाराशिकोह, शाहशुजा आणि मुरादलाही ठार केले. असा औरंगजेब कोणत्याही धर्मात असला तरी तो कोणत्याही सभ्य समाजाचा आदर्श ठरू शकत नाही. मोगल शासक भारतात तलवार घेऊन आले ते येथील संपत्ती लुटण्यासाठी. त्यामागे धार्मिक प्रेरणा नक्कीच होती. 1399 साली भारतावर हल्ला करण्यासाठी तैमूर लंगडा घुसला. त्याने हजारो निरपराधांची कत्तल केली. ‘तुजुक-ए-तैमुरी’मध्ये तैमूर सांगतो, “हिंदुस्थानात घुसण्याचा माझा हेतू साफ आहे. मी येथे पर्यटनासाठी आलो नाही. काफिरांना मारणे, दुसरे काफिरांची दौलत लुटणे. कारण ती मुसलमानांसाठी आईच्या दुधाइतकीच प्रिय आहे.” हे असे असताना देशातील एक प्रख्यात सिने कुटुंब आपल्या मुलाचे नाव ‘तैमूर’ ठेवते व आपले पंतप्रधान त्या तैमूरचे कौतुक करतात. ते सर्व औरंगजेब कबर खात्याचे लोक सहन करतात.
लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती…
वाराणसी म्हणजे काशीत औरंगजेबाने मंदिरे तोडली. आता ‘अमृत काला’त वाराणसीत कॉरिडोर बनविण्यासाठी शेकडो मंदिरे आणि पुरातन मूर्तींवर बुलडोझर फिरवले. त्या उद्ध्वस्त मूर्तींचे पुढे काय झाले? कोणीच सांगू शकले नाही. मोदी यांच्या काळात हे मूर्तिभंजन घडले. औरंगजेब क्रूर होताच, पण नंतरचे ब्रिटिश शासनकर्तेही क्रूरच होते व त्यांनी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना, भारतीय क्रांतिकारकांना निर्दयपणे मारले. जालियनवाला बागेत निःशस्त्र लोकांवर गोळीबार करणारा जनरल डायर हा ब्रिटिश शासक होता व आज आपले ब्रिटिशांशी उत्तम संबंध आहेत. मोगलांच्या खुणा आपण नष्ट करत आहोत, पण ब्रिटिशांच्या खुणा जतन करून ठेवल्या आहेत. औरंगजेबाने त्याचा बाप, भाऊ यांना तुरुंगात डांबले किंवा खतम केले. लालकृष्ण आडवाणी यांची स्थिती पाहिल्यावर अनेकांना ‘कैद’ झालेल्या शहाजहानची आठवण आल्याशिवाय राहत नाही.