मुंबई,दि.११: मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी वडील खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बोलताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. नारायण राणे जेवत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याचा उल्लेख करत नितेश राणे म्हणाले, तो व्हिडीओ आजही मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे, ज्यादिवशी परतफेड करेन, त्या दिवशी तो व्हिडीओ डिलीट करेन असे वक्तव्य केले आहे.
तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना २३ ऑगस्ट २०२१ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. टीका करताना त्यांच्या एका विधानाने वाद निर्माण झाला होता.
नारायण राणे म्हणाले होते की, ‘स्वातंत्र्य दिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्य दिन कोणता माहिती नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती’, असे विधान राणेंनी केले होते. त्यानंतर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. जेवण करत असतानाच राणेंना पोलिसांनी अटक केली होती.
काय म्हणाले नितेश राणे?
“नारायण राणेंना अटक केलेला जो क्षण आजही माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवला आहे. ज्या दिवशी परत फेड करेन त्याच दिवशी डिलीट मारणार. कुणालाच सोडणार नाही. तो क्षण टप्प्याटप्याने जवळ आलेला आहे. कोण कुठे जात नाही, सर्वांना हिशेब इथेच होणार आहे. राणे साहेबांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला कुणीही सुटणार नाहीत,”, असं नितेश राणेंनी बोलून दाखवलं.