भाजपा आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडें यांच्यावर गंभीर आरोप 

0

पुणे,दि.5: भाजपा आमदाराने राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे. सरपंच संजय देशमुख हत्त्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी पुण्यात सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सर्वपक्षीय सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती आणि नंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून 50 लाख रुपये घेण्यात आले, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. दैनिक लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे. 

लोकमतच्या वृत्तानुसार आमदार सुरेश धस यांनी तारखांचा उल्लेख करत धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. धस म्हणाले, “14 जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. वाल्मीक कराडला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने ही बाब वाल्मीकला खटकली. त्यामुळे वाल्मीकने जोशीला खडसावलं आणि त्यानंतर 19 जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली.”

“या बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली. वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्यास सहमत दाखवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच ५० लाख रुपये द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना 50 लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मीक कराड याने हे मला माहीत नाही. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्या,” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here