पुणे,दि.२०: मराठा आंदोलक (manoj jarange patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे जवळचे संबंध असल्याचे समोर आले आहे. देशमुख यांची हत्या कराडच्या सांगण्यावरूनच करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? | manoj jarange patil
परळीतील ज्यांच्या कार्यालयात खंडणी आणि संतोष देशमुख यांच्या खुनाचे नियोजन झाले. त्या माजी मंत्र्यांना (धनंजय मुंडे) यांना सहआरोपी केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्र्याला (धनंजय मुंडे) यांना वाचविले असल्याचा आरोप मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी केला आहे.

जरांगे पाटील यांनी नेरे येथे पत्रकारांशी संवाद साधला. जरांगे पाटील म्हणाले, ‘संतांची भूमी असलेला बीड जिल्हा बदनाम झाला आहे. राजकीय स्वार्थासाठी गुंड टोळ्यांच्या माध्यमातून खून केले जात आहेत. सत्तेतून पैसा, संपत्ती कमावणे. त्यामुळे बीड जिल्ह्यात नागरिकांना त्रास झाला आहे. हे थांबविण्यासाठी समाजाने खोट्याला खोटे म्हटले पाहिजे. शासनाने खोट्याची पाठराखण करू नये, अशी अपेक्षा होती. संतोष देशमुख हत्येतील सहआरोपी यांना राजकीय पाठबळामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाचवले आहे. त्यामुळे सह आरोपी करण्याची मागणी करण्याचे बंद करावे लागले आहे’.
…म्हणून मंगेशकर रुग्णालयावर कारवाई नाही
मुख्यमंत्री फडणवीस यांचे सगेसोयरे असल्याने गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान करणाऱ्यांनाही सोडले जाते. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन फसवले. सत्ता हातात आली म्हणून अत्याचार केल्यास जनता सोडणार नाही’.