नवी दिल्ली,दि.22: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातही राज्यात सत्तांतर झाले. सत्तेचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. उद्धव ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना अपात्र ठरण्याबाबत आणि विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. पण यावर सुनावणी होण्यास मुहूर्त लागत नाहीये.
सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबत अजूनही अनिश्चितता आहे. सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) सप्लिमेंट्री लिस्टमध्ये महाराष्ट्राचे कामकाज उद्यासाठी समाविष्ट नाही. त्यामुळे सुनावणी उद्या होण्याची शक्यता देखील अद्याप दिसत नाही.
क्वचितच वेळा सप्लिमेंट्री लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी कामकाजामध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे सुनावणी उद्या होणार नसल्याची वकिलांमध्ये चर्चा आहे. या आधी 22 ऑगस्टला ही सुनावणी होणार होती. त्यानंतर ती पुढे जाऊन मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण उद्याही ही सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे.
या आधी राज्यातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 4 ऑगस्टला शेवटची सुनावणी झाली होती. त्यानंतर आता चौथ्यांदा ही सुनावणी पुढे गेली आहे. सरन्यायाधीश एस व्ही रमणा (CJI NV Ramana) हे या 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी महाराष्ट्राचेच न्यायमूर्ती उदय लळित हे सरन्यायाधीश होणार आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा यांच्या निवृत्तीपूर्वी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. या सुनावणीबाबत अद्याप अनिश्चितता असल्याने सरन्यायाधीश रमण्णा यांच्या कारकीर्दीत याचा निकाल लागेल ही आशा आता मावळत चालली आहे.