चंद्रशेखर बावनकुळे यांचे शरद पवारांसंदर्भात मोठे वक्तव्य

0

मुंबई,दि.२९: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मोठी बंडखोरी करत थेट सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. यातच आता भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक सूचक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. 

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाजपसोबत हातमिळवणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा होती. शरद पवारांनी भाजपसोबत जाण्यास नकार दिला होता. याचसंदर्भात आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले असून, मोठा दावा केला आहे. 

त्यांची भूमिका आज वेगळी असली तरी

शरद पवारांनी आता भाजपाबरोबर येण्यास नकार दिला आहे. पण कालांतराने विचार बदलत असतात. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे. काही वेळ जाऊ द्यावा लागतो. देश कल्याणासाठी काय केले पाहिजे? असा विचार कधी ना कधी त्यांच्याकडून होईलच, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांची भूमिका आज वेगळी असली तरी जीवनामध्ये कालांतराने काही ना काही वेगळेपण येत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे कालांतराने शरद पवारही याचा विचार करतील. राज्य आणि देशाच्या हितासाठी सर्वच लोक एकत्र आले पाहिजे. शेवटी राष्ट्रहित महत्त्वाचे आहे, असे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान,  सध्या विरोधीपक्षात खूप संभ्रम आहे. जसे २०२४ वर्ष जवळ येईल, तसे तुम्हाला विरोधीपक्षाच्या विधानमंडळातील खुर्च्या कमी होताना दिसतील, असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here