नवी दिल्ली,दि.२५: “पूर्वीचा काळ हा केवळ आज्ञापालनाचा होता, परंतु आजची नवीन पिढी (Gen Z) प्रत्येक गोष्टीमागे तर्क आणि उत्तर शोधते. त्यामुळे पालकांनी मुलांवर केवळ आदेश लादण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधला पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत,” असे मोठे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. नवी दिल्लीत आयोजित ‘विश्व मंगलम् सभा’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘घरात डिप्रेशन नको, डिस्कशन हवे’
कुटुंबातील संवाद कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत सरसंघचालकांनी सांगितले की, आजकाल पती-पत्नी ऑफिसमधून आणि मुले शाळेतून आल्यावर जेवण उरकून प्रत्येक जण आपापल्या मोबाईल फोनमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे घरातील संवाद संपत चालला आहे.
ही सवय बदलण्याची गरज व्यक्त करत ते म्हणाले, “घरात डिप्रेशन (तणाव) नसावे, तर डिस्कशन (सकारात्मक चर्चा) झाले पाहिजे.” पालकांनी मुलांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले पाहिजे, जेणेकरून मुले आपल्या मनातील भावना मोकळेपणाने मांडू शकतील.
तर्क शोधणारी नवी पिढी आणि पालकांची भूमिका
आपल्या बालपणीच्या आठवणींचा संदर्भ देत मोहन भागवत म्हणाले की, पूर्वी माता-पित्यांच्या सांगण्यावर कोणीही शंका घेत नसे. मात्र, आजची मुले प्रत्येक गोष्टीमागे कारण आणि तर्क विचारतात. आजचे वातावरण भौतिक साधने आणि विविध प्रभावांनी घेरलेले आहे. या गोंधळातून मुलांना बाहेर काढायचे असेल, तर पालकांनी त्यांना अधिक वेळ, आपुलकी आणि प्रेम दिले पाहिजे.
पालकांनी स्वतः अपडेट राहावे
“मुलगा आयुष्यात कितीही मोठा झाला किंवा परदेशात गेला, तरी त्याला आपल्या मुळांची (Roots) आठवण नक्की येते. अशा वेळी मुलांनी काही वैचारिक प्रश्न विचारल्यास पालकांकडे त्याची उत्तरे नसणे योग्य नाही. म्हणूनच पालकांनी स्वतःही माहिती आणि ज्ञानाबाबत अपडेट राहिले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
उपदेशापेक्षा आचरण महत्त्वाचे
नवीन पिढीला संस्कार देण्याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी स्पष्ट केले की, आजची मुले मोठ्यांच्या वर्तनाचे बारकाईने निरीक्षण करतात. जर वडील स्वतः खोटे बोलत असतील, तर मुले ते लगेच पकडतात. त्यामुळे संस्कार हे केवळ तोंडी उपदेश देऊन नाही, तर पालकांच्या चांगल्या आचरणातून आणि संवादातूनच दिले जाऊ शकतात.








