बारामती,दि.७: राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. विमान अपघाता नंतर अनेकांनी यावर शंका उपस्थित केल्या आहेत. नेमके अपघात की घातपात यावर चर्चा सुरू असताना आमदार रोहित पवारांनी यावर मोठे वक्तव्य केले आहे. (Rohit Pawar On Ajit Pawar Aeroplane Crash)
दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे विलिनीकरण होणार होते अशीही चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी १२ फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होते असे सांगितले. मात्र अजित दादांच्या निधनानंतर ही चर्चा थांबण्याचे सांगितले. रोहित पवार यांनी विमान अपघात आणि दोन्ही पक्षाच्या विलिनकरणावर १३ दिवस झाल्यानंतर बोलणार असल्याचे सांगितले होते.
काय म्हणाले रोहित पवार? | Rohit Pawar On Ajit Pawar Aeroplane Crash
अपघातासंदर्भातील शंका आणि संभाव्य विलीनीकरण यावर रोहित पवार यांनी प्रथमच सविस्तर आणि सूचक वक्तव्य केलंय. पक्षावर बोलण्याचा अधिकार नसला तरी भावनिक अधिकार नक्की आहे,” असे स्पष्ट करत रोहित पवार यांनी आगामी १० आणि १२ तारखेला महत्त्वाचे खुलासे करणार असल्याचे जाहीर केलंय. रोहित पवारांनी मतदान केल्यानंतर ते बारामतीत बोलत होते.
अपघाताबद्दलच्या शंकांवर मी दहा तारखेला बोलेन, त्याचबरोबर विलीनीकरणावर अजित दादांची काय इच्छा होती, ती १२ तारखेला सांगणार असेही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. अजित दादांची काही इच्छा होती ते पत्रकार परिषद घेऊन मी सांगणार असंही त्यांनी म्हटले आहे. विलीनीकरणाबाबत नेमकं काय घडलं तेही ते पत्रकार परिषदेत सांगणार आहे.
दहा तारखेला विमानाबद्दलच्या शंका ज्या आमच्या मनात आहेत, त्या शंका मी मुंबईत प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन लोकांसमोर मांडेन, विलीनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती, हे मी १२ तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगेन, १२ तारीख का? तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती कशी होती याबद्दल मी बोलेन, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.








