सोलापूर,दि.७: Masood Azhar On Operation Sindoor |भारताने पाकिस्तानला जोरदार दणका दिला आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात दहशतवादी आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझजरच्या कुटुंबातील १० सदस्य ठार झाले आहेत. दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई करत भारताने मंगळवारी रात्री १.३० वाजता ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याने स्वतः याची पुष्टी केली आणि सांगितले की, भारतीय हल्ल्यात त्याच्या कुटुंबातील १० सदस्य आणि चार जवळचे सहकारी मारले गेले आहेत.

काय म्हणाला दहशतवादी मसूद अजहर? | Masood Azhar On Operation Sindoor
या हल्ल्यानंतर, दुःखी मसूद अजहर म्हणाला की या हल्ल्यात मीही मारला गेला असता तर बरे झाले असते. जैश-ए-मोहम्मदने एका निवेदनात म्हटले आहे की, “मौलाना कशफ यांचे संपूर्ण कुटुंब, मौलाना मसूद अझहर यांच्या मोठ्या बहिणीसह मारले गेले आहे आणि मुफ्ती अब्दुल रौफ यांचे नातवंडे, बाजी सादिया यांचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुले जखमी झाली आहेत. बहुतेक महिला आणि मुले मारली गेली आहेत.”
हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या अजहरच्या कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या व्यक्तींना आज दफन करण्यात येईल.
काल रात्री उशिरा भारतीय सशस्त्र दलांनी पंजाबमधील जैश-ए-मोहम्मदचा बालेकिल्ला असलेल्या वहावलपूरसह नऊ दहशतवादी अड्ड्यांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ‘भारताची कारवाई केंद्रित, मोजमापित आणि चिथावणीखोर नव्हती.’ ते म्हणाले की, पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता.