राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टची राजकीय वर्तुळात चर्चा

0

दि.८: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्टची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अमोल कोल्हे हे काही दिवस कोणाच्याही संपर्कात राहणार नसल्याचं तसंच, काही निर्णयांचा फेरविचार करणार असल्याचं सूचक वक्तव्य केलं आहे. अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टमुळं राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना उधाण आलं आहे.

खासदार अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ‘सिंहावलोकनाची वेळ. गेल्या काही दिवसांत, महिन्यात, वर्षात बेभान होऊन धावत राहिलो, काही टोकाचे निर्णय घेतले. अनपेक्षित पावलंही उचलली. पण हे सगळं जुळवाताना झालेली ओढाताण, तारेवरची कसरत, वेळेची गणितं, ताणतणाव यामुळं जरा थकवा आलाय. थोडा शारीरिक, बराचसा मानसिक. शारिरीक थकवा आरामाने निघून जाईल, पण मानसिक थाकवा घालण्यासाठी हवं- थोडं मनन, थोडं चिंतन,’ असं अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

तसंच, ‘घेतलेल्या निर्णयांचा विचार आणि कदाचित फेरविचार सुद्धा त्यासाठीच एकांतवासात जातोय. काही काळ संपर्क होणार नाही. पुन्हा लवकर भेटू. नव्या जोमाने, नव्या जोशाने,’ असं सूचक वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केलं आहे. या पोस्टममध्ये अमोल कोल्हे यांनी टीप लिहित फक्त चिंतनासाठी जातोय, चिंतनशिबिरासाठी नाही, अशी मिश्किल टिप्पणीदेखील केली आहे.

अमोल कोल्हे यांच्या फेसबुक पोस्टची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता अमोल कोल्हे कोणता निर्णय घेणार याबाबच चर्चा रंगू लागल्या आहेच. तसंच, करोना संसर्गाच्या काळात राज्यातील लोकप्रतिनिधी सतत कामात व्यस्त होते. करोनावरील उपाययोजना, मजुरांचे प्रश्न यावर लोकप्रतिनिधी काम करताना दिसत होते. तसंच, राजकीय दौरे, चर्चा, बैठका यातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. आता करोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. त्यामुळं अमोल कोल्हे यांनी रोजच्या धकाधकीच्या कामातून थोडी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे का?, अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत. तसंच, अमोल कोल्हेंच्या फेसबुक पोस्टचा नेमका अर्थ काय?, असाही सवाल उपस्थित होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here