सोलापूर,दि.7: फटाके उडवण्यास विरोध केल्याने एकाचा खून केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर येथील विजापूर नाका झोपडपट्टी क्र. दोन, उत्कृर्ष नगर येथील महेबूब नबीलाल करणकोट (वय 60) यांचा शनिवारी (ता. 6) पहाटे दीडच्या सुमारास खून झाला. फटाके वाजविल्याने घरासमोरील घोडा उधळत आहे, त्यामुळे फटाके वाजवू नका, म्हणाल्याने हा खून झाल्याचे विजापूर नाका पोलिसांत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील चौघांना अटक केली असून एकजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी फटाके उडवविण्यासाठी रात्री आठ ते दहा ही वेळ ठरवून दिली आहे. तरीही, अवेळी फटाके वाजविणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, काल (शनिवारी) उत्कृर्ष नगरातील तरुण त्या वेळेचे उल्लंघन करून महेबूब करणकोट यांच्या घरासमोरील परिसरात फटाके वाजवत होते. महेबूब करणकोट हे टांगेवाले असल्याने त्यांच्या घरासमोर त्यांचा घोडा बांधलेला होता.
फटाक्यांच्या आवाजाने तो उधळत होता. त्यामुळे महेबूब यांनी त्या तरुणांना या ठिकाणी फटाके वाजवू नका, असे बजावले. तो राग मनात धरून त्या तरुणांनी शनिवारी पहाटे महेबूब यांना मारहाण केली. लाकूड डोक्यात घातल्याने महेबूब करणकोट यांचा जागीच मृत्यू झाल्याचे विजापूर नाका पोलिसांनी सांगितले. खुनाची माहिती समजताच पोलिस आयुक्त हरीश बैजल, उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त माधव रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील हे पुढील तपास करत आहेत.
घरासमोरील घोडा फटाक्यांच्या आवाजाने उधळत असल्याने या ठिकाणी फटाके वाजवू नका म्हणणाऱ्या 60 वर्षीय महेबूब करणकोट यांचा खून केल्या प्रकरणात चौघांना अटक केली आहे. त्यात शुभम रणदिवे, मंगेश रणदिवे, व्यंकटेश कोळी, विक्रम क्षीरसागर या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर राहुल साबळे हा संशयित आरोपी फरार झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक हनपुडे-पाटील यांनी दिली.