पंतप्रधानांचे कारवाईचे आदेश
दि.20: बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर झालेल्या हिंसाचाराविरोधात सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत ४५० जणांना अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावरील पोस्टची सत्यता पडताळणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ठिकठिकाणांहून ४५० जणांना अटक केली आहे. दंगलीप्रकरणी विविध ठिकाणी ७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, ५० वर्षांपूर्वी बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला विरोध करणाऱ्या विचारसरणीच्या संघटना आताही हिंसाचार भडकवण्यासाठी चिथावणी देत आहेत. द्वेष असलेली असत्य माहिती पसरवत आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी मंगळवारी झालेल्या साप्ताहिक कॅबिनेट बैठकी दरम्यान, गृहमंत्री असदुज्जमान खान यांना कारवाईचे निर्देश दिले. धर्माचा वापर करून हिंसाचार घडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पंतप्रधानांनी दिले असल्याचे वृत्त ‘ढाका ट्रिब्युन’ने दिले आहेत.
मागील आठवड्यापासून बांगलादेशमध्ये हिंदू समुदायाला लक्ष्य केले जात आहे. नवरात्रौत्सवात दुर्गा मंडप, मंदिरांवर धर्मांधांनी हल्ले केले. सोशल मीडियावर कथित ईश निंदा केल्याच्या दाव्यावरून कोमिल्लामध्ये पहिल्यांदा हिंसाचार झाला. त्यानंतर बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार झाला. रविवारीदेखील हिंदू समुदायाच्या २० घरांना आग लावण्यात आली. पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर विश्वास नको
पंतप्रधान शेख हसीना यांनी सोशल मीडियावर कोणत्याही अधिकृत माहितीशिवाय विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. सोशल मीडिावर असलेल्या पोस्टबाबतची सत्यता पडताळण्याचेही आवाहन त्यांनी नागरिकांना केले. हिंसाचाराच्या अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी गृह मंत्रालयाला सतर्क राहण्याची सूचना त्यांनी दिली.