कलबुरगी,दि.३: Kalaburagi Accident: एका खासगी बसने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बसने अचानक पेट घेतल्याने बसमधील ७ जण जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ६.३० च्या सुमारास कलबुरगी (Kalaburagi Accident) जिल्ह्यातील कमलापूर (Kamalapura) नजीक घडली. मृत सर्व प्रवाशी सिकंदराबाद येथील आहेत.
या अपघातात इतर २२ जण जखमी झाले असून त्यापैकी ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोव्याहून हैदराबादकडे निघालेल्या ऑरेंज कंपनीच्या या खासगी वातानुकूलित बसमध्ये एकूण २९ प्रवाशी होते असे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर बसमध्ये एवढी मोठी आग लागली की, स्थानिकांना बसच्या जवळही जाता आले नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन दलासह दाखल झाले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. आगीत बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व मृत हे सिकंदराबादचे रहिवासी आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशा पंत यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघातात तीन महिला आणि दोन लहान बालकांसह सात जण होरपळून मरण पावले आहेत. त्यात अर्जुन(३७), सरलादेवी अर्जुन(३४), विवान अर्जुन(२), शिवकुमार(३५), रवाली शिवकुमार(३०), दीक्षित शिवकुमार (९),अनिता राजू (४०) असे सात जणांचा समावेश आहे.
या बसमध्ये दोन तीन कुटुंबाचे लोक प्रवास करत होते अपघातात बचावलेल्या कुटुंबीय सदस्य घाबरलेल्या अवस्थेत होते. स्थानिकांनी अपघात होताच घटनास्थळी आले परंतु आग इतकी भयंकर होती की त्यांना बसजवळ जाणे शक्य नव्हते.
पोलीस पुढील तपास करीत आहेत.