मुंबई,दि.७: Uddhav-Raj Thackeray | शिवसेना-मनसे युतीबाबत उध्दव ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती व्हावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा आहे. अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र आतापर्यंत ही युती झाली नव्हती. मात्र आता माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना-मनसे युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Uddhav-Raj Thackeray News)
महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार | Uddhav-Raj Thackeray
शिवसेना-मनसे युतीवर उद्धव ठाकरे काल थेटच बोलले. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार,’ असे स्पष्ट शब्दांत सांगताना ‘संदेश देणार नाही, मी बातमीच देतो’ असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे शिवसेना-मनसे यांच्यात सूर जुळणार, असे संकेत मिळाले असून अवघ्या महाराष्ट्राची उत्सुकता ताणली गेली आहे.

शिवसेना ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेलेल्या सुजाता शिंगाडे आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा स्वगृही परतल्या. ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत प्रथमच भाष्य केले.
उद्धव ठाकरे-राज ठाकरे कधी एकत्र येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. साद दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे; पण शिवसेनेने अधिकृत प्रस्ताव पाठवावा मग पाहू, असे मनसे म्हणत आहे, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय, असे पत्रकारांनी विचारले असता, ‘ठीक आहे बघू ना… जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि टाळय़ांचा कडकडाट झाला.