शरद पवारांनी निवडणूक निकालावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0

सातारा,दि.24: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार गटाला 10 जागा मिळाल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (ठाकरे गट) 20 जागा तर काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाला 132, शिवसेना (शिंदे गट) 57 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 41 जागा जिंकली आहे. 

शरद पवारांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी या निकालावर भाष्य केलं आहे. “आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. पण शेवटी लोकांनी निर्णय दिला आहे. त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करणार नाही. निर्णय लोकांनी दिला आहे. अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. असा अनुभव आम्हला कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाणं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं महत्त्वाचे आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “आम्ही लोकांकडून, कार्यकर्त्यांकडून जी माहिती घेतली त्यातून हे एक महत्त्वाचं कारण आहे असं ऐकायला मिळत आहे. आम्ही सत्तेत नसलो तर पैसे देणं बंद होईल असं सांगण्यात आलं. महिलांचं मतदान वाढलं आहे असं आताच्या आकडेवारीवरुन दिसत आहे”. ईव्हीएम आणि पैशांच्या आरोपांवर त्यांनी भाष्य करणं टाळलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here