Satya Pal Malik On Narendra Modi: सत्यपाल मलिक यांचे पुलवामा घटनेवर दिलेले वक्तव्य व्हायरल

0

सोलापूर,दि.15: Satya Pal Malik On Narendra Modi: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. द वायर या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मलिक यांनी पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबद्दल विशेष द्वेष नसल्याचा दावा केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला (Pulwama attack) हा केंद्रीय गृहमंत्रालयाची मोठी चूक होती, असा दावाही मलिक यांनी केला.

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरनं थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल 40 CRPF जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभर संताप उसळला होता. हे नेमकं कसं घडलं? या हल्ल्यामागे नेमकं कोण होतं? या प्रश्नांची अद्याप उत्तरं सापडलेली नसताना भाजपाच्याच माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यासंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे. पुलवामा हल्यासंदर्भात आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शांत राहाण्यास सांगितलं होतं, असा दावा त्यांनी केल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

Satya Pal Malik On Narendra Modi
सत्यपाल मलिक

काँग्रेसनं केला व्हिडीओ ट्वीट!

आधी मेघालय आणि नंतर जम्मू-काश्मीरचं राज्यपालपद भूषवलेले सत्यपाल मलिक यांनी ‘वायर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा दावा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या मुलाखतीमधील एक व्हिडिओ क्लिप ट्वीट करण्यात आली असून त्यात सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ला झाला, तेव्हा नेमकं काय घडलं? यासंदर्भात मोठा दावा केला आहे.

40 जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, पुलवामा हल्ला आणि त्यात 40 जवान तुमच्या सरकारच्या चुकीमुळे शहीद झाले. जर आपल्या जवानांना एअरक्राफ्ट मिळालं असतं, तर दहशतवाद्यांचा कट उद्ध्वस्त झाला असता. तुम्ही तर या चुकीसाठी कारवाई करणं अपेक्षित होतं. पण तुम्ही हे प्रकरण फक्त दाबलंच नाही, तर स्वत:ची प्रतिमा जपण्याचा तुम्ही प्रयत्न केला. पुलवामावर सत्यपाल मलिक यांचा खुलासा ऐकून देश स्तब्ध झाला आहे”, असं काँग्रेसनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Satya Pal Malik On Narendra Modi: सत्यपाल मलिक यांचा दावा काय?

पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी या मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. “सीआरपीएफनं एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं. कसंही करून दिलं असतं. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती”, असं सत्यपाल मलिक म्हणाले.

सत्यपाल मलिक यांचा गंभीर दावा | Satya Pal Malik

दरम्यान, पुलवामा हल्ला झाला, त्या दिवशी मोदींशी झालेल्या संवादाबाबतही सत्यपाल मलिक यांनी गंभीर दावा केला आहे. “मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा”, असं सत्यपाल मलिक म्हणाले.

सत्यपाल मलिक यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांकडून या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं जाऊ शकतं. याआधीही सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्र सोडलं होतं. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मोदींची भेट घेतली असता त्यांच्याशी पुढच्या पाच मिनिटांत आपले भांडण झाले असं सत्यपाल मलिक म्हणाले होते.

त्यांना खूप गर्व होता… | Satya Pal Malik On Narendra Modi

“जेव्हा मी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पंतप्रधानांना भेटलो तेव्हा पाच मिनिटांतच माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यांना खूप गर्व होता. जेव्हा मी त्यांना सांगितले, आपले 500 लोक मेले आहेत, यावर त्यांनी माझ्यासाठी मेले आहेत का?, असा प्रतिप्रश्न मला विचारला. मी म्हणालो की, हो तुमच्यासाठीच मेलेत कारण तुम्ही राजे झाला आहात ना. यावरून माझे त्यांच्याशी भांडण झाले,” असे मलिक म्हणाले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here