सिंधुदुर्ग,दि.12: भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मतदारांना धमकी दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे. या प्रचारादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी धक्कादायक विधान केलंय. त्यांनी आपल्या वक्तव्यातून मतदारांना थेट धमकीच दिलीय.
Nitesh Rane | काय म्हणाले नितेश राणे?
“चुकून जरी माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एकाही रुपयाचा निधी देणार नाही. आता तुम्ही ही धमकी समजा, काहीही समजा, आपलं कॅल्युकेशन स्पष्ट आहे,” अशी थेट धमकी नितेश राणे यांनी कणकवली (Kankavali) मतदारसंघातील नांदगावमधील मतदारांना दिली आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी त्यांनी थेट आपल्या विचारांचा सरपंच (Sarpanch) आला नाही तर निधी येणार नाही, असं म्हटलं.
हेही वाचा विजेची तार प्लॅटफॉर्मवर उभ्या टीसीवर पडली, धक्कादायक घटनेचा Video व्हायरल
![Nitesh Rane | Nitesh Rane's threat to voters](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/12/Nitesh-Rane-News.jpeg)
सगळा निधी आता माझ्या हातात आहे: नितेश राणे
चुकून जरी इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकाही रुपयाचा निधी देणार नाही. एवढी काळजी मी निश्चितपणे घेईन. म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काहीही समजा. पण आपलं कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे. म्हणून मतदान करताना एक लक्षात घ्या, कारण सगळा निधी आता माझ्या हातात आहे. जिल्हानियोजन निधी असो, ग्रामविकासचा निधी असो, 2515 चा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो. सत्ते असलेला मी आमदार आहे. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या. जर नितेश राणेच्या विचारांचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही हे सरळ स्पष्ट आहे.
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/12/IMG-20221128-WA0029-30-1024x1024.jpg)
बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार
दरम्यान, नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यात भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचांचा सत्कार आमदार केला. ओम गणेश निवासस्थानी आमदार नितेश राणेंनी बिनविरोध आलेल्या सात सरपंचांसह 100 सदस्यांचा सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
नितेश राणेंचा सत्तेचा माज जनता उतरवेल: आमदार वैभव नाईक
राणेंना सत्तेचा माज असल्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत. नारायण राणेंचा सुद्ध माज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने उतरला होता, तसाच सत्तेचा माज नितेश राणेंचा देखील जनता उतरवेल. त्यामुळे मतदारांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देऊ नये, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणेंवर टीका केली. खरंतर विकास ही प्रक्रिया असते. ही सत्ता कोर्टाच्या आदेशानुसार कधीही पडू शकते. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. शिंदे फडणवीस यांचं सरकार येऊन सहा महिने झाले तरी नितेश राणे यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यांना ते मिळणार नाही. इथल्या जनतेला नम्र आवाहन आहे की, ज्याप्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून विकास झाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही सुद्धा होईल.