चंद्रपूर,दि.2: काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलन स्थगित केले. मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. मराठा आरक्षणाकरिता मराठा समाजाने आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तसा अध्यादेश काढला.
नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. सरकारने जरांगेंच्या मागणीनुसार सगेसोयरे या शब्दाचा उल्लेख करत अधिसूचना काढली. यावर १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या जातील त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. मात्र या अध्यादेशाविरोधात ओबीसी नेत्यांकडून सातत्याने आक्रमक आवाज उचलला जात आहे.
जर मराठ्यांना ओबीसीतून सर्रासपणे आरक्षण दिले जात असेल तर…
चंद्रपूर येथील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट ७ फेब्रुवारीला सरकारच्या अध्यादेशाविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, ओबीसीत साधारण ३९५ जाती आहेत. त्यात केवळ १७ टक्के आरक्षण आहे. त्यात दिलेले आरक्षण हेदेखील अद्याप कोर्टात आहे. त्यामुळे जर मराठ्यांना ओबीसीतून सर्रासपणे आरक्षण दिले जात असेल तर आमचा त्याला विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण द्या, त्यांना आमचा विरोध नाही. परंतु मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसीतून आरक्षण देऊ नका. कारण ओबीसीतील आरक्षण आम्हाला पुरेसे नाही. मराठ्यांना वेगळे आरक्षण देण्यात यावे असं त्यांनी सांगितले.
तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका. जर आरक्षणाला धक्का लागला तर मराठ्यांचे एकवटलेले चित्र महाराष्ट्रात आपण पाहिले तसेच चित्र भविष्यात ओबीसींबाबतीतही घडल्याचं राहणार नाही असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला. त्याचसोबत चंद्रपूर मतदारसंघ हा दिवंगत बाळू धानोरकर यांचा होता. अख्ख्या महाराष्ट्रात केवळ एकमेव मतदारसंघ काँग्रेसनं राखला. त्यामुळे पक्षाने आदेश दिला नसेल तरी दावेदार म्हणून माझी लोकसभेची तयारी सुरू आहे. मला तिकीट मिळेल असा विश्वास आहे. कारण याठिकाणी दुसरा दावेदार नाही. ही हक्काची जागा आम्ही सोडणार नाही. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे असंही प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं.