महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

0

मुंबई,दि.11: महाराष्ट्रात अद्यापही पावसाचे सावट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील केळी, द्राक्षे, ज्वारी, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ही परिस्थिती पुढचे 5 दिवस राहण्याचे सांगण्यात आले आहे. वादळी पावसामुळे उकाड्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज (दि. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सलग होणाऱ्या पावसाने हवेत गारवा येण्याची शक्यता असली तरी कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही जिल्ह्यातील तापमान 37 अंशांपार गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे.

राज्यात मागच्या 24 तासांमध्ये सोलापूर 39.4 तर चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 39.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे तापमान 39 अंशावर पोचले होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून 34 ते 37 अंशांच्या दरम्यान होते.

आग्नेय अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. राज्यात कमाल तापमानात 3 ते 5 अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here