जालना,दि.4: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. रविवारी जरांगेंनी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर ते आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी या निवडणुकीमधून माघार घेण्याची घोषणा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. आपण माघार का घेत आहोत हे सुद्धा जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. ते अंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल(दि.3) कोण-कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. तसेच, कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे याबाबतही सांगितले होते. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही
आपण निवडणुकीतून का माघार घेत आहोत हे सांगताना, “एका जातीवर लढणे आणि जिंकणे शक्य नाही,” असं जरांगेंनी समर्थकांना सांगितलं आहे. तसेच पुढे बोलताना जरांगेंनी, ‘मराठा बांधवांनी त्यांचे सर्व अर्ज मागे घ्यावेत, एकही अर्ज ठेवू नका,” असं जरांगेंनी म्हटलं आहे. “आपल्याला आता निवडणूक लढायची नाही,” असं जरांगेंनी जाहीर केलं आहे. “मित्र पक्षांनी यादी न पाठवल्याने आपण माघार घेत आहोत,” असं जरांगेंनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
दरम्यान, जरांगेंनी मतदारसंघ ठरले होते मात्र उमेदवार ठरले नव्हते असं म्हटलं आहे. “मतदारसंघ ठरले होते. फक्त नावं ठरायची होती. ही माघार नाही गनिमी कावा आहे,” असं जरांगे म्हणाले. तसेच “समाजाची आठवण येत असताना रविवारी बोलताना डोळ्यात पाणी येत होतं,” असंही जरांगेंनी सांगितलं.
मराठा, मुस्लिम आणि दलित अशी त्रिसूत्री घेत या बैठकीत २५ मतदार संघावर चर्चा करण्यात आली. रात्री १४ मतदार संघ ठरवून मराठा समाजाचे उमेदवार अंतिम करायचे होते. इतर ठिकाणी मुस्लिम, दलित मित्रपक्षातील उमदेवार देण्यावर चर्चा करण्यात आली. सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कोणत्या जागांवर निवडणूक लढवायची, एका जातीवर निवडणूक लढायची का यावर चर्चा करण्यात आली. परंतु, मित्रपक्षाची यादी सकाळी ९ वाजले तरी आलेली नाही.