Sanjay Raut: मुख्यमंत्री पदावरून खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा

0

मुंबई,दि.६: Sanjay Raut: मुख्यमंत्री पदावरून खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. विरोधी बाकावर असलेले अजित पवार त्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्याने महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय हे सामान्य नागरिकांच्या आकलनापलिकडे गेले आहे. अजित पवार, छगन भुजबळांना कंटाळून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपासोबत सत्ता स्थापन केली होती. परंतु, त्याच अजित पवार आणि राष्ट्रवादीतील नेत्यांसोबत आता एकनाथ शिंदे यांना सरकारमध्ये काम करावं लागणार आहे. यावरून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा | Sanjay Raut

“ज्या बातम्या समोर येताहेत, त्यानुसार हे अपेक्षितच होतं. हा (एकनाथ शिंदे बंड) औटघटकेचा खेळ होता. बहुमत १७० चं असतानाही ४० जणांचा एक गटा नव्याने आणला जातो, याचा अर्थ तुमची गरज संपली. आता आपण गाशा गुंडाळा”, असं टीकास्त्र संजय राऊतांनी केलं.

नवे मुख्यमंत्री मिळतील

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद धोक्यात आहे असं म्हटलं होतं. त्यांच्या याच वाक्याचा त्यांनी पुन्हा पुनरूच्चार केला आहे. ते म्हणाले की, “अजित पवार गटातील ९ मंत्र्यांनी शपथ घेतली. पण शिंदे गटाच्या बाशिंग बांधून बसलेल्या लोकांना शपथ दिली जात नाही. मी परत एकदा दावा करतो की महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील हे नक्की.”

“एकनाथ शिंदे गटाची ना घर का ना घाटका अशीअवस्था झाली आहे. ही परिस्थिती त्यांनी स्वतःहून ओढून घेतली आहे. स्वाभिमान आणि जुनी वक्तव्य आठवत असतील, तर राजीनामे द्या. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं त्यांच्यासोबत बसणार नाही, अजित पवारांमुळे आम्ही पक्ष सोडला असं म्हणणाऱ्यांनी आता राजीनामे द्या. मांडीला मांडी लावून काय, ते आता मांडीवरच येऊन बसले”, असं टोलाही त्यांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here