मुंबई,दि.१०: Sanjay Raut On Ajit Pawar: विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला ईव्हीएमवर विश्वास असल्याचे म्हटले होते. यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत अंतर्गत धुसपूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता अजित पवार यांनी केलेल्या EVM वरील विधानावर संजय राऊत यांनी आक्षेप नोंदवला आहे. अजित पवार यांचा ईव्हीएमवर विश्वास असेल. मात्र, देशाचा विश्वास नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Ajit Pawar: काय म्हणाले होते अजित पवार?
ईव्हीएममध्ये घोळ करता आला असता, तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते. एवढ्या मोठ्या देशात गडबड कुणी करू शकत नाही. पराभवाचे कारण काही लोक ईव्हीएमवर ढकलून देत आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले होते. या वक्तव्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकमत नसल्याचे बोलले जात आहे. यातच आता संजय राऊत यांनीही या विधानावर आक्षेप घेतला आहे.
देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही | Sanjay Raut On Ajit Pawar
अजित पवार हे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. अजित पवारांचा ईव्हीएमवर विश्वास आहे, तर तो त्यांचा मुद्दा आहे. पण, देशाचा नाही. देशातील लोकांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. भाजपाच्या भक्त आणि अंधभक्तांचा ईव्हीएमवर विश्वास आहे. त्यामुळे अजित पवारांची तुलना अंधभक्तांशी होते, असे मला वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यानंतर आता ईव्हीएमवरून महाविकास आघाडीत मतभिन्नता असल्याच्या चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहेत.
दरम्यान, देशामध्ये नक्कीच महागाई बेरोजगारी आहे. त्याच वेळेला घटनात्मक पदावर बसलेल्या संविधानाची शपथ घेतलेल्यां कडे डिग्री असायलाच पाहिजे, असा नियम नाही. पण लाखो पदवीधर आणि डिग्री वाले हे बेरोजगार आहेत. हा विषय महत्त्वाचा आहे. पण ज्यांच्याकडे डिग्री आहे ती खरी की खोटी आहे हा विषय समजला महत्त्वाचा आहे. जर अमित शहांनी ही डिग्री दाखवली आहे. त्यावर प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला आदर्शवादी पंतप्रधान लाभलेले आहेत, त्यांच्या डिग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर त्यांच्यावर काही तुलना नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.