सोलापूर,दि.4: भाजपाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आज राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत एक असणारा समज खोटा ठरणार आहे.
काँग्रेसचे सत्ता असतानाही अनेक नेत्यांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद भूषवले आहे. मात्र आतापर्यंत झालेल्या उपमुख्यमंत्रिपदापैकी कुणीही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. 1978 साली सर्वात पहिल्यांदा नाशिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपद भूषवलं होतं. त्यावेळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ केवळ चार महिन्याचा राहीला होता. तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले. पण त्यांना पुढे कधीही मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही.
राज्याचे शरद पवार हे मुख्यमंत्री असताना सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री झाले होते. सोळंकेचा कार्यकाळ हा दोन वर्षाचा राहीला. पण पुढच्या राजकीय जिवनात त्यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कधीच मिळाली नाही. वसंतदादा पाटील 1983 साली पुन्हा मुख्यमंत्री झाले. रामराव आदिक हे उपमुख्यमंत्री झाले. त्यांनाही पुढे कधीच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही.
राज्यात भाजपा शिवसेनेची सत्ता 1995 साली प्रथमच आली. यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपाकडून गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर आर आर पाटील, छगन भुजबळ हे देखील उपमुख्यमंत्री झाले. मात्र ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद भुषवले तो नेता परत कधीही मुख्यमंत्री झाला नाही.
राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी एक चर्चा सगळीकडेच होती. जो एकदा उपमुख्यमंत्री होतो तो परत मुख्यमंत्री होत नाही. त्यामुळे फडणवीस आता राज्याचे परत मुख्यमंत्री होणार नाहीत. हा समज देवेंद्र फडणवीस यांनी खोटा ठरवला आहे.