मुंबई,दि.१७: सत्य लपत नाही, काळानुसार सत्य समोर येतेच असे ट्विट करत ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. त्यातच, आता शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला आहे. एकीकडे संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे शिवसेनेचा किल्ला लढवण्यासाठी इतही सरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातच, ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत आहेत. आता, धनुष्यबाणावरुन सुरू असलेल्या लढाईदरम्यान, दिघेंनी एकनाथ शिंदेंवर कार्टुनच्या माध्यमातून टिका केली आहे.
शिवसेना ही संघर्षातून घडलेली संघटना आहे. दिघेसाहेबांनीही प्रचंड संघर्ष केला. आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. शेवटच्या श्वासापर्यंत भगवा सोडला नाही. तळागळातील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांनी शिवसेना वाढवली. मला जिल्हाप्रमुखपद दिलंय, त्यातून प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचण्याचं काम मी करणार आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही अशा शब्दात ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यापूर्वी सुनावलं होतं. आता, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर टिका करताना त्यांनी ते दाखवत शिवसेना असले तरी त्यांचा खरा आरसा हा भाजपा असल्याचं म्हटलं आहे. निश्चितच जनता त्यांना आरसा दाखवेल, असेही त्यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.
काहीजण म्हणतात आम्हीच खरे पण त्यावर काळ उत्तर देत असतो… सत्य लपत नाही. काळानुसार सत्य समोर येतेच… जो चुकतो त्याला समाजच आरसा दाखवतो!, अशा शब्दात केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, यासोबत एक कार्टुनही शेअर केले असून त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा खरा चेहरा भाजपच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
केदार दिघेंनी यापूर्वीही म्हटले होते की, जेव्हा शिवसैनिकांची साथ असते तेव्हा कितीही मोठा संघर्ष असला तरी तो सोपा असतो. मला लहान वयात जिल्हाप्रमुख पद मिळालं आहे. माझ्यासारख्या तरूणाला हे पद मिळाल ते ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आहे. शिवसेना ही कुणाची मक्तेदारी नाही. बाळासाहेबांमुळे आणि आनंद दिघेंमुळे शिवसेना ठाण्यात उभी राहिली आहे. बाळासाहेबांच्या विचारामुळे ही शिवसेना घडली आहे. कुणाचा फोटो झाकून न झाको शिवसैनिक विचारांवर ठाम आहे. शिवसैनिक हे विचार पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.