बीडमधील हिंसाचाराबाबत धनंजय मुंडे यांचा खळबळजनक दावा

0

बीड,दि.५: बीडमधील हिंसाचाराबाबत धनंजय मुंडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अलीकडेच बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके याचं घर जाळलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर बीडचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजलगावसह बीड जिल्ह्यात घडलेल्या जाळपोळीच्या घटना हे एक मोठं षडयंत्र होतं, असा खळबळजनक दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

बीडमधील हिंसाचाराच्या घटनांवर भाष्य करताना धनंजय मुंडे म्हणाले, “काही समाजकंटकांनी बीड जिल्हा पेटवण्याचा प्रयत्न केला, असा प्रयत्न यापूर्वी कधीही झाला नव्हता. एवढा भयानक प्रकार ३१ तारखेला बीड जिल्ह्यात घडला. यापूर्वी देशात आरक्षणासाठी अनेक आंदोलनं झाली. पण अशा आरक्षणाच्या आंदोलनात कुणाच्या घरावर किंवा व्यवसाय करण्याच्या ठिकाणांवर अशाप्रकारे हल्ले झाले नाहीत. पण बीड जिल्ह्यात त्या दिवशी लोकप्रतिनिधिंची घरं जाळण्यापासून त्यांची व्यावसायाची ठिकाणं जाळण्यापर्यंत जे काही प्रकार घडले, त्याचा मी जाहीर निषेध करतो.”

जीवे मारण्यापर्यंत प्रयत्न झाला

“हे सर्वकाही अचानकपणे घडलं आहे. माजलगावसह बीड जिल्ह्यातील बऱ्याच घटना पाहता, यामध्ये फार मोठं षडयंत्र दिसून येत आहे. ज्यापद्धतीने एका ऑडिओ क्लिपचा अनर्थ काढून संबंध मराठा समाजामध्ये वितुष्ट निर्माण करायचं काम केलं. माजलगावमध्ये काहीतरी होणार हे पोलिसांना कळेपर्यंत तिथले लोकप्रतिनिधी प्रकाश सोळंके यांच्या घरावर जाळपोळ आणि त्यांना जीवे मारण्यापर्यंत प्रयत्न झाला. विशेष म्हणजे प्रकाश सोळंके स्वत: मराठा समाजाचे आहेत, तरीही त्यांच्या घरावर हल्ला झाला,” असंही धनंजय मुंडे यांनी नमूद केलं.

कुठल्या समाजाचा आहे, हे बघून हल्ले

पालकमंत्री मुंडे पुढे म्हणाले, “बीडमध्येही एक-एक व्यक्ती, त्यांची घरं, त्यांचा व्यवसाय, तो कुठल्या समाजाचा आहे, हे बघून हल्ले करण्यात आले आहेत. यामागे फार मोठं षडयंत्र आहे. आतापर्यंतच्या माझ्या माहितीनुसार, पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. माजलगावच्या घटनेत जवळपास २५० ते ३०० जणांची ओळख पटली आहे. तर बीडच्या इतर घटनेतही बऱ्याच लोकांची ओळख पटली आहे.”

बीडमध्ये झालेल्या हल्ल्यांचा विचार केल्यास काही ठाराविक लोकांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. हे सगळं नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून झालं आहे, त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here