अरवली,दि.२: Accident: भाविकांना कारने चिरडल्यामुळे ६ जणांंचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरातमधील अरवली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एका भरधाव कारने काही भाविकांना जोरदार धडक दिली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अरवल्तील कृष्णापूरजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या अपघातातील मृतांची ओळख पटवली जात असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे सर्व जण पायी अंबाजीच्या दर्शनासाठी चालत निघाले होते. त्याचवेळी भरधाव कारने त्यांना चिरडल्याची घटना घडली. हा अपघात नेमकं कसा झाला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. ही कार महाराष्ट्र पासिंग असल्याची माहिती मिळाली आहे. पण, ती कोणाची आहे, याबाबत अद्याप कुठलाही माहिती नाही.
अरवल्लीतील अपघाताचा फोटो पाहून हा अपघात किती भीषण आहे याचा अंदाज येतो. पादचाऱ्यांना धडकणाऱ्या कारच्या पुढील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारची अवस्था पाहून ही टक्कर किती जोरदार होती याचा अंदाज येतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरवल्लीतील अपघाताचा तपास सुरू आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल.