नवी दिल्ली,दि.२४: सीजेपीच्या (Cockroach Janta Party) प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या चर्चेत सकारात्मक घडामोडी झाल्याचे समोर आले आहे. मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांपैकी तीनपैकी दोन मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता उद्या होणारी पुढील बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीनंतर सीजेपीने स्पष्ट केले की, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. यासोबतच, आंदोलनाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात यावी आणि आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले 11 एफआयर मागे घेण्यात यावेत, अशी ठाम मागणी संघटनेने पुन्हा एकदा मांडली.
सीजेपीकडून एकूण चार प्रमुख मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, परीक्षा अनियमिततेमुळे प्रभावित कुटुंबांना आर्थिक मदत, निर्दोष आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणे आणि परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करणे या मुद्द्यांचा समावेश आहे.
दरम्यान, या आंदोलनाचे प्रमुख चेहरा असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी 26 दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. नड्डा यांच्या हस्ते ज्यूस ग्रहण करून वांगचूक यांनी उपोषण सोडले.
उपोषण सोडण्यापूर्वी वांगचूक यांनी सरकारकडून तीन महत्त्वाची आश्वासने मिळवली. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत, पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर चर्चा करून सुधारणा केल्या जातील, तसेच आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी हमी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आता उद्याच्या बैठकीत उर्वरित मुद्द्यांवर अंतिम निर्णय होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








