Ajit Pawar On Amruta Fadnavis: अजित पवार यांनी दिली अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

0

मुंबई,दि.26: Ajit Pawar On Amruta Fadnavis: अजित पवार यांनी अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या (Ajit Pawar) मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “झोकून काम करणारा नेता मुख्यमंत्री झालेला आम्हालाही आवडेल,” असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं. यानंतर पत्रकारांनी याबाबत अजित पवारांना विचारलं. तसेच सत्ताधाऱ्यांचा सूर बदलल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले… | Ajit Pawar On Amruta Fadnavis

अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर विचारणा केली असता अजित पवार म्हणाले, “मग त्यात वाईट काय आहे मला जर कुणी चांगलं म्हणत असेल, तर मला त्याचं समाधान आहे. प्रत्येकाने चांगलं काम करावं म्हणजे प्रत्येकाला लोक चांगलं म्हणतील. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याला काय उत्तर देऊ शकतो हे मला कळलेलं नाही.”

आम्ही दगडं मारून सभा बंद पाडणारे लोक आहोत, असं वक्तव्य करणाऱ्या गुलाबराव पाटलांविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, “गुलाबराव पाटलांनी वेगवेगळी वक्तव्यं केली. ते शिवसेनेच्याच कुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेनेच त्यांना आमदार केलं. बाळासाहेब ठाकरेंनीच त्यांना तिकिट दिलं. आता त्यांच्यात काही राजकीय मतमतांतरं झाली आहेत आणि शिंदे गटाकडे गेले आहेत.”

“बोलण्याच्या ओघात काही लोक बोलतात. माध्यमांनी त्याला इतकं गांभीर्याने घेऊ नये. ते माध्यमांना हेडलाईन हवं असतं म्हणून त्याचा पुरवठा करत असतात. त्यापेक्षा महाराष्ट्रात बेरोजगारीचा, महागाईचा, शेतकऱ्यांचं गारपीटीने झालेल्या नुकसानीचा प्रश्न आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अनेक ठिकाणी खरेदी केंद्रं बंद पडली आहेत. ते विषय सोडून कोण काय म्हणतंय हेच सुरू आहे,” अशी टीका अजित पवारांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here