नवी दिल्ली,दि.10: सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला. तिहार तुरुंगातून सुटल्यानंतर केजरीवाल आपल्या निवासस्थानी पोहोचले आहेत. घरी जाताना ते कारमधून बाहेर आले आणि आप कार्यकर्त्यांना संबोधित केले.
ते म्हणाले की, तुम्हा सर्वांमध्ये राहून बरे वाटते. मी लवकरच येईन असे सांगितले होते, मी आलो. उद्या सकाळी 11 वाजता कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराला भेट देणार असून दुपारी 1 वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांनी आप कार्यकर्त्यांना संबोधित करत देश हुकूमशाहीच्या काळातून जात असल्याचे सांगितले. केजरीवाल तब्बल 50 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आले. केजरीवाल यांच्या स्वागतासाठी तिहार तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणात आपचे कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी भाषण करताना केजरीवाल यांनी जनतेला एकत्र येऊन हुकुमशाहीपासून देशाला वाचवण्याचे आवाहन केले आहे.