नवी दिल्ली,दि.२१: loudspeaker on mosque: महाराष्ट्रासह अनेक राज्यात सध्या भोंग्यावरून वातावरण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंगे काढावेत अशी भूमिका घेतली. यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यात सभा घेतली. यावेळीही राज ठाकरेंनी भोंगे काढावेत अशी मागणी केली. अशातच आता धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले लाउडस्पीकर हटवण्यात यावेत, अशी विनंती एका पत्र याचिकेद्वारे अखिल भारतीय हिंदू महासभेने सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्याकडे केली आहे. लाउडस्पीकरवरून दिल्या जाणाऱ्या अजानबाबत सुमोटो दखल घ्यावी व अशाप्रकारे अजान देण्यावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणीही या पत्र याचिकेत करण्यात आली आहे.
अखिल भारतीय हिंदू महासभेने सरन्यायाधीशांकडे सादर केलेल्या पत्र याचिकेत अनेक तर्क मांडण्यात आले आहेत. मशीद, ईदगाह आणि दर्गा ही प्रार्थनास्थळे नाहीत तर सार्वजनिक संमेलन आणि बैठकांची ठिकाणे आहेत. त्यामुळेच ही स्थळं सामुदायिक बैठकीची ठिकाणे म्हणून घोषित केली जावीत, अशी विनंतीही या याचिकेत करण्यात आली आहे. इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि कुराण रचले गेले तेव्हा लाउडस्पीकर नव्हते. त्यानंतर इस्लाम धर्माच्या प्रसारातही लाउडस्पीकर कुठेही नव्हता. म्हणजे लाउडस्पीकरचा आणि इस्लामचा दुरान्वये संबंध नाही, असा तर्कही याचिकेत मांडण्यात आला आहे. सर्वच धार्मिक स्थळांवर फक्त सणादिवशी लाउडस्पीकरला अनुमती असावी. इतरदिवशी त्यास मनाई असावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर अद्याप सुनावणी निश्चित करण्यात आलेली नाही.
दरम्यान, महाराष्ट्र , गुजरात , उत्तर प्रदेश यासह अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांचा वाद पेटला आहे. हे भोंगे हटवण्याची मागणी झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात हा मुद्दा सध्या सर्वाधिक गाजत असून राजकारणही चांगलंच तापलं आहे.