Load Shedding In Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक भागात दहा वर्षांनंतर प्रथमच अघोषित भारनियमन सुरू

0

नागपूर :Load Shedding In Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक भागांत दहा वर्षांनंतर प्रथमच अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. मागणीच्या तुलनेत तब्बल अडीच ते तीन हजार मेगावॉट विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांत दहा वर्षांनंतर प्रथमच अघोषित भारनियमन सुरू झाले आहे त्यामुळे उन्हाच्या चटक्याबरोबरच नागरिकांना वीज भारनियमनाच्या झळाही बसू लागल्या आहेत. राज्यातील २४ हजार २०० पैकी १३०० फीडरवर ( संचयक ) सध्या अडीच ते तीन तासांचे भारनियमन सुरू आहे त्यात महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारितील नागपुरातील २२१, कोकण विभागातील ४९०, पुणे विभागातील २३५ फिडरचा समावेश आहे. वीजगळती अधिक असलेल्या भागांत सध्या भारनियमन सुरू आहे त्याचा उत्तर महाराष्ट्रात मालेगावातील तीन लाख यंत्रमागांना मोठा फटका बसला आहे.

वीजेअभावी ग्रामीण भागांत पिकांना पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आह़े शिवाय, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आह़े तसेच पुढे रमजान ईदही आहे. या सर्वाना भारनियमनाचा फटका बसण्याचे संकेत आहेत.

राज्यात मार्च २०२२ मध्ये वीजमागणी २८ हजार मेगावॉट होती. सध्या वीजमागणी २६ हजार ५०० मेगावॉटपर्यंत खाली येऊनही मागणी आणि पुरवठय़ात अडीच ते तीन हजार मेगावॉटची तूट आहे. ती दूर करण्यासाठी ५८ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असलेल्या जी-१ ते जी-३ फिडरवरून वीजकपात केली जात आहे. याची झळ राज्यातील बहुतांश भागांना बसत आहे.

उत्तर महाराष्ट्रात शेतीसह मालेगाव येथील तीन लाख यंत्रमागांना वीजटंचाईचा फटका बसला आहे. नाशिक शहरालाही त्याची झळ बसू लागली आह़े धुळे, जळगाव, नंदुरबार शहर आणि ग्रामीण भागांत तीन-चार तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होतो. नाशिक परिमंडळातील (नगरसह) ३०० फीडरवरही वीज कपातीचे सावट आहे. जळगाव ग्रामीणमधील २०७ आणि शहरातील १२ रोहित्रे म्हणजे जवळपास निम्म्या जिल्ह्यावर टांगती तलवार आहे.

वीज कपातीने मराठवाडा हैराण

मराठवाडय़ातील वीज मंडळाच्या औरंगाबाद, नांदेड व लातूर तीन परिक्षेत्रातील ५६६ फिडरवर सध्या सरासरी तीन तास भारनियमन होत आह़े नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक ३७१ फीडरवर सरासरी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित होतो. औरंगाबाद शहरातील १६० फीडरवर सरासरी दोन तास वीजकपात केली जात आहे.

प. महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत

पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चारही जिल्ह्यांत दोन-चार तासांपासून ते दहा-बारा तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित होत आहे. या अघोषित भारनियमनामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागांतही जनजीवन विस्कळीत झाले आहे. अक्कलकोट तालुक्यात गेल्या १५ दिवसांत फक्त २० ते २५ तास वीजपुरवठा होऊ शकला. काही गावात तर ७२ तासांत अवघा दीड तास वीज उपलब्ध होती, असे सांगण्यात आले.

कल्याण पूर्वेतील मलंगगड परिसरात ५५ टक्क्यांपेक्षा अधिक वीजहानी असल्यामुळे तिथे दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित केला जातो, अशी माहिती महावितरणच्या उच्चपदस्थांनी दिली. रायगड जिल्हात १२४ फीडरवर आपत्कालिन वीजकपात केली जात आहे. पालघर जिल्ह्यात गळतीनिहाय गटांत ३ ते ९ तासांपर्यंत वीजकपातीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here