Sanjay Raut On NCP: शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीला दिला सूचक इशारा

0

मुंबई,दि.१ एप्रिल २०२२: Sanjay Raut On NCP: शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादीला सूचक इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरही टीका केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे असे दिसते, तुम्ही कुठेही घुसून कोणत्याही प्रकारे तपास करताय. यातून केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. रेल्वे स्थानकांवर पाकिटमारी होते. आता फक्त त्याचाच तपास ‘ईडी’ आणि सीबीआयकडून करणं बाकी आहे, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

ज्या प्रकारे काश्मीरमध्ये किंवा ईशान्येत अतिरेकी घुसतात बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात. त्याच पद्धतीने केंद्राच्या या अतिरेकी कारवाया सुरू आहेत. तपास यंत्रणा राज्यांमध्ये घुसतात. त्यांना घुसवलं जातं. अटक करून ते निघून जातात. जर यातून संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्यांमधील दरी वाढेल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ( Uddhav Thackeray ) पत्र पाठवलं आहे. केंद्र सरकारच्या या कारवाईविरोधात एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. केंद्राकडून बिगर भाजपशासित राज्यांमध्ये ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर या सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, अशी ममता बॅनर्जींची भूमिका असल्याचं राऊत यांनी सांगितलं.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके हे गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत. ते महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर काही आरोप करत आहेत. या आरोपांनंतर ही कारवाई झाली आहे. कारवाई करायला काहीच हरकत नाही. पण केंद्रीय तपास यंत्रणांनी जो हस्तक्षेप केला, त्यावरून या कारवाईवर संशय निर्माण होत आहे आणि प्रश्न उपस्थित होत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी केंद्राला आणि भाजपला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या पोलिसांना व्यवस्थित काही सूचना मिळाल्या आणि मार्गदर्शन मिळालं तरी काम होऊ शकेल. गृह खात्याने अधिक सक्षम आणि कठोर होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल या विषयावर आपली चर्चा झाली. ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा घुसताहेत महाराष्ट्रात, हे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या गृह खात्यावरचं आक्रमण आहे. महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा ज्यांच्या आखत्यारित आहे, त्यांनी यावर गांर्भीयाने लक्ष दिलं पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारच्या तपास यंत्रणाकडून कारवाई होत आहे. पण राज्यात गृह खात्याकडून पावलं उचलली जात नाहीत, यावरही संजय राऊत बोलले. ही आस्ते कदम भूमिका जर घेत असाल तर ते स्वतःसाठी फाशीचा दोर ओढताहेत, असा इशारा संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आहे. राष्ट्रवादीकडे गृहखातं आणि राष्ट्रवादी आक्रमकपणे लढत नाहीए किंवा ठोस पावलं उचलत नाहीए, असं मी म्हणणार नाही. मी माझं मत सांगितलं. गृहखात्याला आता दमदार पावलं टाकावी लागतील. नाहीतर तुम्ही तुमच्यासाठी रोज एक नवीन खड्डा खणाल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी आज दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here