मुंबई,दि.7: सर्वांच्या लाडक्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) जवळपास महिनाभरापासून आजारी होत्या. त्यांच्यावर शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रमुख नेते व काँग्रेसचे मुंबईतील मंत्री मात्र तिथं उपस्थित नव्हते. त्यावरून चर्चा सुरू झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत खुलासा केला आहे.
‘बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख हे सर्वजण करोनाबाधित आहेत. त्यामुळे ते काल लतादीदींच्या अंत्यदर्शनाच्या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत. माझ्या बहिणीच्या सासू वारल्यामुळे मी तिकडे होतो. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या मुंबईबाहेर होत्या. शनिवार, रविवार असल्यामुळं अनेकांचे दौरे होते. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती, त्यामुळं आम्ही पोहोचू शकलो नाही,’ अशी माहिती पटोले यांनी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप हे अंत्यविधीला उपस्थित होते, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
‘लतादीदी या काँग्रेस परिवारातल्याच होत्या. त्यांचं योगदान मोठं आहे. काँग्रेसच्या वतीनं सर्व ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. तालुका पातळीवरही श्रद्धांजलीचे कार्यक्रम होणार आहेत. मी स्वत: लतादीदींच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहे, असंही पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.