नवी दिल्ली : देशात सध्या लोकसभेची निवडणूक झाली तर राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, असा दावा ‘पोल ट्रॅकर’च्या ‘मूड ऑफ इंडिया’ सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सत्तेचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून विरोधकांच्या इंडिया आघाडीला आघाडी मिळू शकते. या निकालांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सर्वेक्षणाशी संबंधित व्हिडीओ शेअर केला. “आता खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार, जुने चांगले दिवस परत येणार, मोदी-शाह जाणार, ते नक्की जाणार,” अशा शब्दांत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.
इंडिया आघाडीला २८० जागांचा अंदाज
‘पोल ट्रॅकर’ने देशातील सर्व ५४३ लोकसभा मतदारसंघांमध्ये हे सर्वेक्षण केल्याचा दावा केला आहे. ३ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात तब्बल ४ लाख ५३ हजार जणांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्वेक्षणातील अंदाजानुसार, आजच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास इंडिया आघाडीला ४४ टक्के मतांचा वाटा मिळू शकतो. त्यातून विरोधकांच्या आघाडीला तब्बल २८० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दुसरीकडे, भाजपप्रणित एनडीएला ४० टक्के मतांसह सुमारे २४० जागांवर समाधान मानावे लागू शकते, असा दावा करण्यात आला आहे. इतर पक्षांना १६ टक्के मते आणि २३ जागा मिळण्याचा अंदाज सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे.
राम मंदिर आणि विद्यार्थी आंदोलनाचा परिणाम?
सर्वेक्षणाच्या कालावधीत अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहाराचा मुद्दा तसेच जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन चर्चेत होते. या मुद्द्यांचा सत्ताधारी आघाडीच्या जनाधारावर परिणाम होण्याची शक्यता सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दीर्घकाळ सत्तेत राहूनही सत्ताविरोधी लाटेचा फारसा परिणाम होऊ दिला नाही. मात्र, सध्याच्या काही मुद्द्यांमुळे मतदारांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता असल्याचे सर्वेक्षणातील निष्कर्ष सूचित करतात.
पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना पसंती?
पंतप्रधानपदाच्या पसंतीबाबतही सर्वेक्षणात विरोधकांसाठी सकारात्मक चित्र दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या नावाला ५८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली, तर नरेंद्र मोदी यांच्या नावाला ११ टक्के पसंती मिळाल्याचे आकडे सर्वेक्षणात देण्यात आले आहेत.
मोदी सरकारच्या कामगिरीबाबत ४३ टक्के नागरिक समाधानी असल्याचे, तर ४७ टक्के नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचवेळी एनडीए सरकारच्या कामगिरीवर ५८ टक्के लोक नाराज असल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात मांडण्यात आला आहे.
राहुल गांधींच्या कामगिरीला ६१ टक्के समर्थन
विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्या कामगिरीबाबतही सर्वेक्षणात सकारात्मक कल दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. तब्बल ६१ टक्के सहभागी नागरिकांनी त्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.
देशातील तरुणांच्या भविष्यासाठी पुढील नेतृत्व कोणाकडे असावे, या प्रश्नावरही राहुल गांधी यांना नरेंद्र मोदींपेक्षा अधिक पसंती मिळाल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नावाला ६९ टक्के, तर नरेंद्र मोदी यांच्या नावाला २३ टक्के पसंती मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘पोल ट्रॅकर’च्या या सर्वेक्षणातील आकडेवारी ही संभाव्य राजकीय कल दर्शवणारी आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचा कौल, आघाड्यांची रचना आणि स्थानिक राजकीय समीकरणे यामुळे निकाल वेगळा असू शकतो.








