नवी दिल्ली,दि.१५: वाहनांचे अपघात अनेकवेळा होतात. अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आठ आसनी सर्व कारमध्ये एअरबॅग्जची व्यवस्था करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय गडकरी यांच्या मंत्रालयाने घेतला आहे.
नितीन गडकरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आठ आसन क्षमतेच्या सर्व कारमध्ये कमीतकमी सहा एअरबॅग्स उपलब्ध करून देणे कार उत्पादक कंपनीसाठी बंधनकारक असेल. याबाबतच्या जीएसआर अधिसूचनेचा मसुदा आज मंजूर केला असल्याची माहिती दिली. या निर्णयामुळे निश्चितपणे कारचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात प्राणहानी टळणार आहे, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
In order to enhance the safety of the occupants in motor vehicles carrying upto 8 passengers, I have now approved a Draft GSR Notification to make a minimum of 6 Airbags compulsory. #RoadSafety #SadakSurakshaJeevanRaksha
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 14, 2022
नितीन गडकरी हे सातत्याने रस्ते सुरक्षेसाठी महत्त्वाची पावले टाकत आहेत. याआधी १ जुलै २०१९ पासून त्यांनी कारमध्ये चालकासाठी एअरबॅग बंधनकारक केली होती. त्यानंतर १ जानेवारी २०२२ पासून चालकाच्या बाजूच्या सीटसाठीही एअरबॅग अनिवार्य केली आहे. आता त्यापुढचं पाऊल टाकून गडकरी यांनी आठ आसनी सर्व कारमध्ये सहा एअरबॅग्जची व्यवस्था अनिवार्य केली आहे. यामुळे प्रामुख्याने समोरासमोर वाहनांची धडक होऊन जे अपघात होतात त्यात जीवितहानी कमी होणार आहे.