बेंगळुरू,दि.१८: छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर संगोळी रायण्णा आणि राणी चेन्नम्मा यांचं कार्य महान असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे. तसेच यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka Chief minister Basavaraj Bommai) म्हटले आहे. बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद बेळगावात उमटले आणि तिथे क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे तणावाची स्थिती असून बेळगावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या सर्व घटनाक्रमावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Chief minister Basavaraj Bommai) यांची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांनी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर संगोळी रायण्णा आणि राणी चेन्नम्मा यांचं कार्य महान आहे. या महान विभूतींनी राष्ट्रनिर्माणाचे, देशाला एकजूट करण्याचे काम केले आहे. त्यांच्या आदर्शावर आपण पुढे चाललो असून त्यांचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, असे बसवराज बोम्मई यांनी बजावले. जर महापुरुषांच्या नावांवरून आपण लढायला लागलो तर त्यांनी देशाच्या उभारणीसाठी जो लढा दिला त्याचाच एकप्रकारे अपमान होईल. त्यामुळेच जबाबदार नागरिक बनून कुणीही कुणाच्या भावना भडकवणारी कृती करू नये वा कुणाला चिथावणी देऊ नये, असे आवाहन बसवराज बोम्मई यांनी केले.
बेंगळुरू आणि बेळगाव येथे घडलेल्या घटना गंभीर आहेत. त्याचा मी निषेध करतो. ज्यांनी या घटनांना चिथावणी देऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बोम्मई यांनी सांगितले. महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना तसेच दगडफेक, सार्वजनिक मालमत्तेची हानी, सरकारी वाहनांची तोडफोड या सगळ्याच घटना कायदा मोडणाऱ्या असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस पावले उचला असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.