संजय राऊत यांचे अजित पवारांचा उल्लेख करत मोठे विधान

0

मुंबई,दि.२९: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर २९ जानेवारी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी अजित पवारांचा उल्लेख करत मोठे विधान केले आहे. अजित पवारांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज बारामतीत जनसागर लोटला होता. यावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मात्र, दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतं, असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं.

संजय राऊत यांनी गुरूवारी प्रसार माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या कारकीर्दीवर भाष्य केलं. ते म्हणाले की, दादांच्या जाण्याने महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतं. दादा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ होते. त्या स्तंभावर अनेकांचं राजकीय आयुष्य उभं होतं. दादा वन मॅन आर्मी होते. आता त्या आर्मी समोर एक प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झालं असेल.

आता पुढे काय? काल त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यात जे अश्रू होते. त्यांच्या समोर तोच प्रश्न होता. पण या सगळ्या गोष्टींना खूप वेळ जावा लागेल. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र धक्क्यात आहे, अजित दादांचं असं अचानक जाण हा धक्का महाराष्ट्र अद्याप पचवू शकलेला नाही. पुढचे अनेक दिवस महाराष्ट्राला यातून सावरता येणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, अजित दादांना त्यांच्या कुटुंबाचा खास करून शरद पवारांचा राजकीय वारसा लाभला. आणि याचा फायदा त्यांना नक्कीच झाला. अजित दादांचं नेतृत्व हे पहिल्यापासून संघर्षातून निर्माण झालेलं नाही. पण त्यांना कुटुंबाकडून जी संधी मिळाली ती संधी त्यांनी योग्यप्रकारे वापरली. आपलं नेतृत्व त्यांनी निर्माण केलं. सतत लोकांमध्ये पोहोचण्याचा ते प्रयत्न करत होते, लोकांचे प्रश्न सोडवत होते. त्यांना दिलेल्या प्रत्येक निवेदनावर कारवाई होत होती. मग तो सामान्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल, हा माझा अनुभव आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here