नवी दिल्ली,दि.२८: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे लँडिंग करताना अजित पवार यांचे विमान कोसळले, त्यात पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही अत्यंत दु:खद आणि धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली आहे. अजित पवार यांचा मृत्यू हा अकाली असून, कार्यक्षम आणि काम करणाऱ्या नेत्याचा अशा प्रकारे अंत होणे हे सर्वांसाठी आघातकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली होती. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “आम्ही अपघाताची चौकशी करण्याची मागणी करतो. ही एक अतिशय दुःखद घटना आहे. अजित पवार यांचे अकाली निधन झाले आहे. अशा दुःखद व्यक्तीच्या निधनाने आपण सर्वजण दुःखी आहोत. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, अशी मागणी खरगे यांनी केली. “हा अपघात आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
विमान सुरक्षेबाबत सर्वांनाच चिंता असल्याचे सांगत, मोठे राजकीय नेते, तातडीच्या कामासाठी प्रवास करणारे लोक तसेच उद्योगक्षेत्रातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात हवाई प्रवास करतात, असे खरगे यांनी नमूद केले. याआधी मोठ्या विमानांचेही अपघात झाले आहेत. अहमदाबाद येथे घडलेली मोठी दुर्घटनाही सर्वांच्या स्मरणात आहे. अशा परिस्थितीत येथे लहान विमानाचा अपघात नेमका का झाला, याची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.








