मुंबई,दि.२३: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नगरपरिषद निवडणूक प्रचारात बोलताना नाव न घेता भाजपावर यांच्यावर जोरदार टीका केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र भाजपाने अनेक नगरपरिषद निवडणुकीत स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच ठाणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) नेत्यांना भाजपकडून पक्षात घेण्यासाठी जोरदार हालचाली पाहायला मिळत आहेत.
इतर जिल्ह्यातील शिवसेना (शिंदे गट) नेत्यांना भाजपाने मोठ्या प्रमाणात प्रवेश दिला आहे. अॅापरेशन लोटस मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामुळे शिवसेना (शिंदे गट) नेते भाजपावर नाराज असल्याची चर्चा आहे. डहाणू नगर परिषदेच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपावर टीका केली आहे. डहाणू नगर परिषदेत शिंदे गटाचे राजेंद्र माच्छी यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हे नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात एकत्र आलो आहोत. रावणाची लंकाही अहंकारामुळे जळून खाक झाली होती आणि 2 तारखेला कार्यकर्त्यांनी तेच करायचे आहे, असे थेट आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता दिले. डहाणू नगर परिषदेत निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे गट असा थेट सामना होणार आहे. माच्छी यांच्या प्रचार सभेत भाषण करताना अहंकाराविरोधात आपण लढत आहोत असे सांगत शिंदे यांनी रावणाच्या अहंकाराचे उदाहरण दिले.
ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत भाजपने शिंदे गटात फोडफोडी करून अनेकांना भाजपात प्रवेश दिला. त्यावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. याच मुद्दय़ावरून शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मोठय़ा रकमा देऊन माझी माणसे फोडली जात आहेत, अशी तक्रारच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची शहांकडे केली होती. त्यानंतर शिंदे यांनी आज प्रथमच भाजपवर अप्रत्यक्ष टीकेचे बाण सोडले.








