मुंबई,दि.५: शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राऊत म्हणाले की, जर मागणी करणारे आणि मागणी मंजूर करणारे समाधानी असतील तर तिसऱ्या व्यक्तीने उगाच लुडबूड करू नये. स्वत: जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केलेले आहे की, जो मसुदा त्यांच्यासमोर आला किंवा जो जीआर आला त्याबाबत ते समाधानी आहेत, मराठा समाजही समाधानी आहे.
सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तो कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाच लुडबूड करू नये, असे संजय राऊत म्हणाले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २९ अॅागस्टपासून उपोषण सुरू केले होते. जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्या नंतर त्यांनी २ सप्टेंबर रोजी उपोषण सोडले. त्यानंतर मात्र अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, समाजाची फसवणूक झाली असे वक्तव्य सुरू केले.
याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, हा विषय मीडियाने सुद्धा आता फार ताणू नये किंवा लांबवू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तोडगा काढला. तो तोडगा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी स्वीकारला आणि ते समाधानी आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौतुकास पात्र
मनोज जरांगे-पाटील हे त्यांच्या गावाला पोहोचले आहेत. मी काल त्यांचे वक्तव्य ऐकले. त्याच्यामध्ये उगाच ताणाताणी करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राचे नुकसान होईल. ओबीसी समाज सुद्धा त्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे समाधानी दिसतोय, मराठा समाज समाधानी दिसतोय मग आपण कशाकरता त्याच्यावर चर्चा करून वातावरण बिघडवायचे. जे कुणी करत असतील त्यांनी महाराष्ट्राचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू नये, असेही राऊत यांनी ठणकावले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय अत्यंत संयमाने हाताळला. त्यासाठी ते कौतुकास पात्र असल्याचेही राऊत म्हणाले.